दिवाली का साजरी करतात ? दिवाळीत प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे विशेष. वाचा संपुर्ण लेख.

खरं तर आपल्या हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण येतोय दीपावली, ज्याला आपण दिवाळी म्हणतो.

      फार कमी लोकांनाच माहीत आहे की दिवाळी हा सण का साजरा केला जातो. फक्त दिवे लावणे, फराळ, आणि फटाके फोडणे, श्री लक्ष्मी देवींचे पूजन करणे, एवढीच दिवाळी असे नाही. खरंतर यामागे एक रोचक पौराणिक कथा आहे. 

दिवाळी हा सण सनातन हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी प्रभु श्रीराम, बंधू श्री लक्ष्मणजी आणि श्रीमती सितामाता यांच्यासोबत १४ वर्षाचा वनवास संपल्यानंतर अयोध्येत परत आले होते. प्रभू श्री रामांनी रावणाचा अंत केला आहे आणि अयोध्येमध्ये पुन्हा येणार आहेत ही बातमी अयोध्या नगरीमध्ये कळाल्यावर अयोध्येमधल्या लोकांनी जल्लोषात दसऱ्यापासूनच रांगोळी आणि दिव्यांनी अयोध्या सजवली होती. जेव्हा दसऱ्याच्या दिवशी रावणाचा अंत झाला त्याच्याबरोबर २१ दिवसांनी श्रीराम हे अयोध्येत पोहोचले होते तेव्हापासून दिवाळी हा सण साजरा केला जातो. म्हणजे लाखो वर्षांपासूनची ही परंपरा अजूनही हिंदू बांधव साजरी करतात. दिवाळी हा सण ६ दिवस चालणारा सण आहे आणि याच्या प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे. चला तर तुम्हांला या ६ दिवसाचं महत्त्व जाणून घेवूया 

 

१:- वसू बारस/ गोवत्स द्वादशी: अश्विन कृष्ण द्वादशी:

 

पहिला दिवस आहे वसू बारस अर्थात गोवत्स द्वादशी चा. भारतीय संस्कृती मध्ये अर्थव्यवस्था, शेती गायीवर आधारीत आहे. आणि गोवंश प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी गाय वासरे यांचे पूजन केले जाते. घरी गाय आणि वासरू आल्यास त्यांचे पाय धुवून, हळद कुंकू लावून, नैवेद्य दाखवून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. ज्यांच्याकडे गाय आणि वासरू येऊ शकत नाही किंवा उपलब्ध नाहीत त्यांनी धातूच्या गाय-वासराची पूजा घरीच केली तरी चालेल. 

 

२:- धनत्रयोदशी – अश्विन कृष्ण त्रयोदशी:

 

दिवाळीचा दुसरा दिवस आहे धनत्रयोदशी. पूर्वीच्या मान्यतेनुसार सगळ्या देवांनी असुरांसोबत समुद्रमंथन केलं होतं तेव्हा समुद्रातून १४ रत्न निघाले. याच्यातील एक आहे भगवान धन्वंतरी. आपल्या पंचांगानुसार पितृपक्षाच्या १३ दिवसांनंतर भगवान धन्वंतरी हे समुद्रातून हातामध्ये अमृताचा कुंभ घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक आहेत. त्यांनीच पूर्ण संसाराला आयुर्वेदाची ओळख करून दिली. त्यादिवसांपासून या दिवसाला धनतेरस, धनत्रयोदशी असे नांव पडले आणि भगवान धन्वंतरी यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो. यादिवशी सोने, चांदीची आभूषणे, स्टेनलेस स्टीलची भांडी अश्या नव्या गोष्टींची खरेदी करून त्यांची देखील पूजा केली जाते. तसेच ही पूजा झाल्यावर यामदिपदान सुद्धा केले जाते. खरंतर यमराजाची पूजा कधीही केल्या जात नाही. परंतु या दिवशी कणकेचा दिवा बनवून दक्षिणेला ठेवून तो यामराजांसाठी लावला जातो. तसेच कुटुंबात कोणालाही अकाली मृत्यू येऊ नये यासाठी प्रार्थना केली जाते. खरंतर दीपदान ही फार पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. यादिवशी नदी, विहीर, तलाव, ओढे, किंवा कोणत्याही मंदिरात दीपदान करण्याची प्रथा आहे.  

 

:-नरक चतुर्दशी – अश्विन कृष्ण चतुर्दशी:

 

हा दिवाळीचा तिसरा दिवस आहे नरकचतुर्दशी. एके काळी या संसारात भूमिपुत्र नरकासुराचा आतंक होता, त्याला वरदान होतं की त्याचा मृत्यू फक्त त्याच्या आईच्या हातानेच होऊ शकतो. पुढच्या जन्मात भूमिदेवीने माता सत्यभामाच्या रूपात अवतार घेतला, सत्यभामेचे लग्न भगवान श्रीकृष्ण यांच्यासोबत झाले. त्यानंतर माता सत्यभामेने नरकासुराचा अंत केला. तेव्हापासून आजपर्यंत त्या दिवसाला नरकचतुर्दशी या नावाने ओळखले जाते. 

 

४:-लक्ष्मीपुजन- दर्श अमावस्या: 

 

दिवाळीचा चौथा दिवस आहे लक्ष्मीपुजन. देव आणि दैत्य जेव्हा समुद्र मंथन करत होते तेव्हा माता लक्ष्मी प्रकट झाल्या होत्या. तेव्हापासून त्या दिवशी आपल्या घरी भरपूर यश, सुख आणि संपत्तीसाठी माता लक्ष्मी देवी यांची पुजा होते. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी यांच्यासोबत श्री गणेश जी यांची सुध्दा पुजा होते. पुरातन मान्यतेनुसार महालक्ष्मी मातेला कोणतेही संतान नव्हते आणि माता पार्वतीचे २ पुत्र होते. माता लक्ष्मी देवीने माता पार्वतीजवळ श्री गणेश जी यांना दत्तक घेण्याची इच्छा प्रकट केली. माता पार्वतीला चिंता होती की श्रीमती लक्ष्मी देवी कधीच एका जागी थांबत नाही, मग श्री गणेशजींची काळजी त्या कश्या घेतील. याच्यावर श्रीमती लक्ष्मी म्हणाल्या, की मी जिथे जाईन तिथे श्री गणेश यांना सोबतच घेऊन जाईन. म्हणून तेव्हापासून

जिथे माता लक्ष्मीची पूजा केली जाते तिथे श्री गणेशजी यांची सुध्दा पुजा होते.

 

खरंतर दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत आले होते परंतु या दिवशी माता लक्ष्मी आणि श्री गणेश यांची पुजा होते. पुरातन ग्रंथानुसार त्यावेळी भगवान श्री विष्णू हे शयन करतात आणि प्रभू श्रीराम हे भगवान श्री विष्णू यांचा अवतार आहेत. त्यामुळे दिवाळीला प्रभू श्रीराम यांची पुजा केली जात नाही.

 

५:- बलिप्रतिपदा/ गोवर्धन पूजा – 

 

कार्तिक शुक्ल प्रतिपदा, विक्रम संवत २०७९ आरंभ (यावर्षी २६ ऑक्टोबर २०२२ ला): मित्रांनो अश्विन अमावस्येला लक्ष्मीपुजन झाल्यानंतर बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा होतो.

साडे तीन मुहूर्तांपैकी एक हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. अक्षयतृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्ध मुहूर्त आहे. यादिवशी सोने खरेदी, सुवासिनी कडून पतिला ओवाळले जाते.असे खूप काही महत्त्व आहेत व्यापारी लोकांचे नविन वर्ष याच पाडव्यापासून सुरू होते. हिशोबाच्या नविन वह्या त्यांचे पुजन करून नवीन सुरूवात केली जाते. कोणतीही नवीन गोष्ट विकत घेण्यासाठी हा उत्तम मुहूर्त मानला जातो. याच दिवशी गोवर्धन पुजा, अन्नकुट केला जातो. 

 

रामायणानुसार जेव्हा प्रभू श्रीराम हे लंकेवर आक्रमण करण्यासाठी सेतूचे बांधकाम करत होते तेव्हा सगळे वानर (वानर सेना) हे आपआपल्या शक्तीनुसार दगड जमा करत होते तेव्हा श्री हनुमानजीनी हा सेतू बांधण्यासाठी गोवर्धन पर्वतच उचलून आणला होता.परंतु ते यायच्या आतच सेतूचं काम झालं होतं. सेतूमध्ये मदत नाही करता आली म्हणून गोवर्धन पर्वताने त्याचं दुःख श्रीरामांकडे प्रकट केलं. प्रभू श्रीराम यांनी वचन दिलं की पुढच्या जन्मात ते त्या पर्वताचा उपयोग नक्की करतील.आणि श्री हनुमंत यांना सांगितले की हा पर्वत पुन्हा त्या जागी ठेवून ये. पुढच्या जन्मात जेव्हा भगवंतांनी श्रीकृष्ण अवतार घेतला तेव्हा वृंदावन मधील लोकांना गोवर्धनाची पुजा करण्यास सांगितली.याला नाराज होऊन श्री इंद्र देवांनी गोवर्धन पर्वतावर आक्रमण केले. तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी लोकांना वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला आणि श्री इंद्र देव यांचा गर्व मोडला.तेव्हापासून गोवर्धनाची पुजा केली जाते, अन्नकुट उत्त्सव साजरा केला जातो.

 

६:- भाऊबीज – कार्तिक शुक्ल द्वितीया:

 

सहावा दिवस आहे भाऊबीज यादिवशी देवता श्री यमराज आपल्या बहिणीला यमुना देवीना भेटायला त्यांच्या घरी गेले. त्यांच्या बहिणीकडून झालेला आदर सत्कार पाहून ते खूप प्रसन्न झाले. तेव्हा श्री यमराज यांनी हे वरदान दिले की या दिवशी जो भाऊ त्याच्या बहिणीच्या घरी जाईल, त्याला संकटापासून मुक्ती मिळेल आणि मोक्ष मिळेल. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज नावाने साजरा होतो. यादिवशी सगळ्या बहिणी तिच्या भावाच्या सुरक्षेची भगवंतांना प्रार्थना करतात.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts